पुण्यात ‘तितिक्षा कलाकाव्य संध्या’ आणि ‘यशवंत पुरस्कार सोहळा’ उत्साहात संपन्न; ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वाळुंजकर यांचा गौरव
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (गुरुदत्त वाकदेकर) – तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा कलाकाव्य संध्या’ आणि ‘यशवंत पुरस्कार वितरण सोहळा’ शनिवार, ३० मे २०२६ रोजी सदाशिव पेठ येथील भारतीय विचार साधना सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पुणे व इतर भागांतून आलेल्या कवी आणि साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या. तर विशेष अतिथी म्हणून जयमाला इनामदार, रजनी भट, राजश्री आठवले, अंजली पटवर्धन, सतीश इंदापूरकर आणि ‘तितिक्षा यशवंत पुरस्कारा’चे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वाळुंजकर प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्य हे समाजाशी संवाद साधणारे माध्यम
कार्यक्रमात बोलताना तृप्ती देसाई यांनी साहित्य आणि सामाजिक जाणीव यांच्यातील महत्त्वाचे नाते अधोरेखित केले. विशेष अतिथी जयमाला इनामदार यांनी नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अशा उपक्रमांची आज गरज असल्याचे स्पष्ट केले. तर सतीश इंदापूरकर यांनी कविता आणि साहित्य हे समाजाशी जिवंत संवाद साधणारे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
सुहास वाळुंजकर यांना ‘तितिक्षा यशवंत पुरस्कार’
या सोहळ्यात मानाचा ‘तितिक्षा यशवंत पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वाळुंजकर यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी आपल्या अर्धांगिनी अपर्णा वाळुंजकर यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना वाळुंजकर यांनी आपल्या रंगभूमीवरील प्रदीर्घ प्रवासातील अनेक सुवर्णक्षणांना उजाळा दिला आणि आयोजकांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
काव्यमैफलीने रसिक मंत्रमुग्ध
पुरस्कार सोहळ्यानंतर रंगलेल्या ‘कलाकाव्य संध्ये’मध्ये महाराष्ट्रातील विविध कवींनी आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या काव्यमैफलीत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ३० सारस्वतांना प्राधान्य देण्यात आले होते.
या कवी संमेलनात प्रामुख्याने विजय यशवंत सातपुते, प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख, रवींद्र गाडगीळ, विलास बाबर, चंद्रकांत जोगदंड, बाबा ठाकूर, अश्विनी पिंपळे, सुधीर कुलकर्णी, दिपराणी गोसावी, ॲड. संध्या देशपांडे, वैशाली अविनाश वर्तक, नंदकिशोर गावडे, संजय वसंत माने आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या कसदार कवितांचे सादरीकरण केले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र शिर्के आणि गौरव पुंडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय सातपुते आणि प्रिया प्रमोद दामले यांनी केले, तर ‘तितिक्षा इंटरनॅशनल’च्या एम्. अजया आणि अजिता अजित मुळीक यांनी निमंत्रक म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले. सुसूत्र आयोजन आणि पुणेकर साहित्यप्रेमींच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष रंगत प्राप्त झाली होती.















